आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेले काही आजार!

Spread the love

वर्क फ्रॉम होम, ऑन लाईन शाळा, ऑनलाईन बिझनेस हे कोरोना संक्रमण काळात न्यू नॉर्मल झाले आहे. सुरवातीला जरी चांगले वाटले तरीही त्याचे अनेक दुष्परीणाम देखील जाणवायला लागले आहेत त्यापैकी एक त्रास म्हणजे Carpal tunnel syndrome. मुलांना किंवा मोठ्यांना सतत लॅपटॉप मोबाईल वापरण्याने हा त्रास दिसू लागला आहे.

यात त्रास काय होतो ?

  • अंगठा तर्जनी मध्यमा कनिष्ठीका या बोटांमधे वेदना मुंग्या येणे किंवा सुन्न होणे.
  • पूर्ण हात सुन्न होणे किंवा मुंग्या आल्या प्रमाणे वाटणे.
  • हाताला सूज किंवा जड पडल्याप्रमाणे वेदना.
  • सकाळी उठल्यावर पूर्ण हात किंवा बोट शक्तिहीन वाटणे.
  • हातातील वस्तू सुटणे किंवा व्यवस्थित पकडता न येणे.
  • सूक्ष्म कामे करण्यास त्रास होणे. उदा. लिहिणे, पेन पकडणे, लेस बांधणे.
  • शक्ती लागणारी कामे करताना त्रास होणे उदा. डब्ब्याचे घट्ट झाकण उघडणे किंवा खिळा ठोकणे.

ही लक्षणे सतत असतात असेही नाही. हाताला आराम मिळाला की त्रास जाणवतही नाही. परंतु सतत किंवा जास्त कामे केली की त्रास वाढतो. या लक्षणांची उपेक्षा केल्यास तीव्रता वाढत जाते. साहाजिकच हा व्याधी अधिक कष्टकदायक होतो. आताच हा आजार होतोय असे नाही. Carpal tunnel syndrome ची अनेक कारणे आहेत. उदा. हाताला, मनगटाला आघात किंवा मार लागणे.

सतत एकाच दिशेने व एकसारखी हालचाल करणे. लॅपटॉप मोबाईल यावर काम करतांना हा त्रास होताना दिसून येतो.

इतर आजार असणे –

संधिवात, मधुमेह, थायरॉईड इ. गर्भिणी, मेनोपॉझ, संतती प्रतिबंधक गोळ्या अति प्रमाणात घेणे.
चुकीच्या पद्धतीने व्यायाम किंवा अति व्यायाम, जड वस्तू उचलणे.

आयुर्वेदात वात वाढण्याची कारणे सांगतांना वर्णन केले आहे की विषम आसन म्हणजे चुकीच्या पद्धतीने बसणे, नियमित अभ्यंग न करणे, तेल तूप आहारात नसणे, अति चिंता, नैसर्गिक मल मूत्र वेगधारण अति जागरण, अति मैथून, अति व्यायाम, अति प्रवास (गाडी चालविणे) अपघात अशी अनेक कारणे वात वाढवितो या syndrome मधे दिसणारी लक्षणे ही वात वाढण्याची आहेत. त्यामुळे सर्वात श्रेष्ठ चिकित्सा म्हणजे अभ्यंग मालीश करणे. रोज वातहर तेलाने मालीश करणे हा प्रतिबंधात्मक व उपशयात्मक उपाय आहे.

लॅपटॉपवर काम करतांना एका ठिकाणी सतत न बसणे, छोटा छोटा ब्रेक घेणे. असमतल आसनावर न बसणे. मान पाठ ताठ सरळ रेषेत असतील असे बसणे, हाताचे व्यायाम, सर्व सांध्यांचे व्यायाम करणे, व्यवस्थित झोप घेणे असे विहारात बदल करणे गरजेचे आहे.

गुग्गुळ कल्प, अश्वगंधा, दशमूळ, रास्नासारखी औषधे यावर फायदेशीर ठरतात. वैद्याच्या सल्ल्याने औषधी, तेलधारा, स्नेहन स्वेदन, पिंडस्वेद अशा चिकित्सा नक्की जाणून घ्याव्यात.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.