उजनी धरणाऱ्या पाण्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेच; जयंत पाटील!

Spread the love

पुणे | उजनी धरणाऱ्या पाण्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याची चर्चा जोर धरु लागली होती. मात्र दत्तात्रय भरणे हेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कायम राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याची मागणी झालेली नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.

दुसरीकडे आजची बैठक ही सोलापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काय करायला हवं यासाठी होती. उजनीच्या पाण्याचा वाद मागेच संपला आहे. आजच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्वत: दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सोलापूरच्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याची चर्चा सुरु झाली होती.

जयंत पाटलांकडून निर्णय रद्द

उजनी घरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला सोलापूरकरांकडून मोठा विरोध करण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात सोलापुरात जोरदार आंदोलनंही करण्यात आली. वाद पेटत असल्याचं लक्षात आल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय रद्द केल्याचं 19 मे रोजी जाहीर केलं होतं.

उजनीच्या पाण्याबाबत दत्तात्रय भरणेंची भूमिका काय होती?

सोलापूरसाठीच्या नियोजित पाण्यामधील उजनी धरणाचं 5 टीएमसी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला होता. आरोप सिद्ध झाल्यास मंत्रीपद नव्हेतर आमदारकीचा राजीनामा देऊन संन्यास घेणार असल्याचं दत्तात्रय भरणे म्हणाले होते. जिल्ह्यातील नियोजित पाण्याचा एक थेंबही इंदापूरसाठी घेतलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. उजनीचं पाणी जर इंदापूरसाठी घेतलं असलं तर राजकीय सन्यास घेईन. उजनी धरणाचं 5 टी एम सी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप केला जातोय, मात्र, माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकर कधी हिरावून घेणार नाही, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.